संपूर्ण राज्यातील ड वर्ग महानगरपालिकांमध्ये पनवेल मनपा अव्वल

पनवेल : महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022 मध्ये पनवेल महानगरपालिकेने ड वर्ग महानगरपालिकांच्या गटामध्ये राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. 20 एप्रिल या नगर विकास दिनाचे औचित्य साधून एनसीपीए येथे झालेल्या भव्य समारंभामध्ये मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते तसेच विधानसभा अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री मा.दीपकजी केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मा. श्री मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव मा.श्री भूषण गगराणी, प्रधान सचिव मा.श्रीमती सोनिया सेठी, आयुक्त तथा संचालक श्री. किरण कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा रुपये 15 कोटींचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पनवेल महानगरपालिकाच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री.गणेश देशमुख,अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ, उपायुक्त श्री सचिन पवार, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते यांनी हा पुरस्कार स्विकारला.
महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास विभागाने राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिका यांकरिता शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022 आयोजित केली होती. यामध्ये विविध घटकांनुसार गुणांकन पद्धतीने वर्गनिहाय प्रत्येक प्रशासकीय विभागातील निवडलेल्या सर्वोत्कृष्ट महानगरपालिका व नगरपालिका यांची राज्यस्तरीय तपासणी समितीने पाहणी करून सदरची निवड केली आहे. या स्पर्धेसाठी मध्यवर्ती चौक, ऐतिहासिक वारसा स्थळे व स्मारक, जलाशयांचे संवर्धन, बाजारपेठा यांचे सौंदर्यीकरण तसेच सुंदर हरित पट्ट्यांची निर्मिती, विविध भागातील स्वच्छता अशा घटकांचा समावेश होता. याकरिता महानगरपालिकेने राबवलेले विविध उपक्रम निर्णायक ठरले.
पनवेल महानगरपालिकेने केवळ भिंती रंगवणे या कामावर भर न देता याबरोबरच शाश्वत सौंदर्यीकरण केले या बाबीचा निवड समितीवर प्रभाव पडला यावर या पुरस्कारामुळे शिक्कामोर्तब झाले.जलाशयांबाबत दीर्घकालीन उपाययोजना करताना वडाळे तलावामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे संवर्धन व सुशोभीकरण केले. सुनियोजित शहर अशी ओळख असलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या या राज्यस्तरीय यशाने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
चौकट
सध्या सुरू असलेल्या विकासकामांमुळे पनवेल महानगरपालिका राष्ट्रीय पातळीवर स्वतःची वेगळी ओळख निश्चितच निर्माण करेल यात शंका नाही, शहराच्या विकासामध्ये सहभाग घेतलेले सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, शहरातील सर्व नागरिक यांच्या सहभागामुळे व सकारात्मक प्रतिसादामुळेच प्रशासनाला सदराचे यश प्राप्त करता आले अशी प्रतिक्रिया महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री .गणेश देशमुख यांनी व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *